अति स्थूलत्व हे हृदयरोग होण्याचे एक कारण आहे. एक किलो वजन वाढले कि त्यासाठी शरीराला नवीन तीनशे किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या तयार कराव्या लागतात अर्थातच हृदयावरचा कामाचा ताण देखील वाढतो. म्हणूनच वजन उंचीच्या प्रमाणात असणे आरोग्याचे लक्षण आहे हे प्रमाण बॉडी मास इंडेक्सच्या प्रमाणात मोजले जाते. शरीराचे वजन प्रमाणापेक्षा जास्त असणे हे जसे धोकादायक आहे त्यापेक्षाही अधिक धोकादायक चरबी पोटात साचली असेल तर ते आहे. कारण पोटात साचलेली चरबी रक्तवाहिन्या वर अधिक दुष्परिणाम करते.
स्थूल माणसानी प्रयत्नपूर्वक त्यांच्या काही सवयी बदलल्या तर वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवता येते. मनाचे स्थैर्य आरोग्यासाठी चांगले असले तरी शरीर सतत स्थिर राहिले तर वजन वाढू लागते. त्यामुळे स्थूल माणासानी शरीर सतत हलते ठेवण्याची सवय लावून घ्यायला हवी. बसल्या बसल्या हातपाय हलवत राहणे, बोटांनी तबल्याचा ठेका धरणे, दर एक तासाने शंभर पावले चालणे, शरीराचे सर्व स्नायू दिवसातून तीनचार वेळा ताणणे यासारख्या साध्या सोप्या सवयीमुळे वजन आटोक्यात ठेवता येते. या कृती अवघड नाहीत पण त्यांची सवय लावून घेणे सोपे नाही.
आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिण्याची सवय देखील वजन वाढवते. आपल्या शरीराच्या मेदाच्या पेशींमध्ये पाणी साठवलेले असते म्हणूनच वजन कमी करण्यासाठी दिलेल्या चिकित्सेमध्ये मूत्र वाढवण्याची औषधे दिली जातात. स्वेदन उपचारांनी देखील शरीरातील पाणी कमी होत असल्याने वजन कमी होते. पण हे सर्व उपाय तात्कालिक असतात. दिवसभरात अडीच ते तीन लीटर पाणी शरीराला पुरेसे असते त्यापेक्षा अधिक पाणी पिण्याची सवय बदलली तर वजन कमी होऊ लागते. काही स्थूल माणसांना सतत तहान लागत असते त्यांनी त्यावेळी दोन चार घोट गरम पाणी पिण्याची सवय लावून घेतली तर अनावश्यक पाणी शरीरात जात नाही.भराभर जेवणे देखील वजन वाढवायला कारणीभूत असते. आपण जेवायला सुरुवात केल्यानंतर दहा मिनिटांनी आपल्या मेंदूतील तृप्तीचे केंद्र काम करू लागते. त्या दहा मिनिटात आपण खूप कमी खाणे आवश्यक असते त्यामुळेच एक घास बत्तीस वेळा चावून खाण्याची जुनी म्हण आजच्या काळात हि कृतीत आणायला हवी. सावकाश जेवायला हवे, सावकाश म्हणजे कमी वेगाने आणि पोटात अवकाश म्हणजे थोडी जागा ठेवून हे दोन्ही अर्थ खरे ठरायला हवेत, सावकाश जेवू लागलो कि प्रत्येक घास जाणीवपूर्वक खाऊ लागतो. असे लक्षपूर्वक घास घेऊ लागलो तर जेवण हे देखील ध्यान होते. अन्नाचा आस्वाद घ्यायचा पण अधिक खाण्याची आसक्ती सोडायची हे तत्त्व आयुष्यात उतरवले तर वजन न वाढवता देखील आपण रसपूर्ण जेवू शकतो, सरस जगू शकतो.