Friday, January 25, 2019

या ५ टिप्सने जपा तोंडाचे आरोग्य!

सर्वांगीण आरोग्याचा विचार केल्यास त्यात तोंडाच्या आरोग्याचाही विचार करणे गरजेचे आहे. आपण सतत काही ना काहीतरी खात असतो. अशावेळी नकळत आपले दातांच्या तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे तोंडाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या टिप्स तुम्हाला फायदेशीर ठरतील.

१. तोंडाचे आरोग्य चांगले  राखण्यासाठी दररोज दात स्वच्छ घासणे, जीभ स्वच्छ करणे देखील गरजेचे आहे.

२. दात आणि हिरड्यांमधील भागाला बोटांनी मसाज करा. मसाज करताना बोटं गोलाकार फिरवा. त्यामुळे तोंडातील अन्नकण बाहेर पडण्यास मदत होईल व त्याचबरोबर रक्तप्रवाह सुधारून दात व हिरड्यांची क्षमता वाढेल.

३. दिवसातून दोनदा दात घासणे गरजेचे आहे. काही खाल्या किंवा प्यायल्यानंतर दातांवर प्लागचा पातळ थर तयार व्हायला सुरवात होते. यामुळे खराब होऊन दात किडू लागतात. तोंडात तयार होणारी लाळ या ऍसिडसी  सामना करते. परंतु, रात्रीच्या वेळी आपले तोंड खूप वेळ बंद असते त्यामुळे तोंडात लाळ कमी प्रमाणात किंवा तयारच होत नाही. म्हणून प्लाग घालवण्यासाठी झोपण्यापूर्वी ब्रश करणे गरजेचे आहे.

४. तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी चांगल्या माऊथवॉशने गुळण्या करणे महत्त्वाचे आहे. बहुतेक माऊथवॉश मध्ये फ्लोराईड असतं व ते dental caries कमी करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे काही खाल्यानंतर किंवा दिवसातून दोनदा चांगल्या माऊथवॉशने अवश्य गुळण्या करा. माऊथवॉश  नसेल तर किमान मिठाच्या पाण्याने तरी गुळण्या करा.  

अति स्थूलता


अति स्थूलत्व हे हृदयरोग होण्याचे एक कारण आहे. एक किलो वजन वाढले कि त्यासाठी शरीराला नवीन तीनशे किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या तयार कराव्या लागतात अर्थातच हृदयावरचा कामाचा ताण देखील वाढतो. म्हणूनच वजन उंचीच्या प्रमाणात असणे आरोग्याचे लक्षण आहे हे प्रमाण बॉडी मास इंडेक्सच्या प्रमाणात मोजले जाते. शरीराचे वजन प्रमाणापेक्षा जास्त असणे हे जसे धोकादायक आहे त्यापेक्षाही अधिक धोकादायक चरबी पोटात साचली असेल तर ते आहे. कारण पोटात साचलेली चरबी रक्तवाहिन्या वर अधिक दुष्परिणाम करते.
स्थूल माणसानी प्रयत्नपूर्वक त्यांच्या काही सवयी बदलल्या तर वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवता येते. मनाचे स्थैर्य आरोग्यासाठी चांगले असले तरी शरीर सतत स्थिर राहिले तर वजन वाढू लागते. त्यामुळे स्थूल माणासानी शरीर सतत हलते ठेवण्याची सवय लावून घ्यायला हवी. बसल्या बसल्या हातपाय हलवत राहणे, बोटांनी तबल्याचा ठेका धरणे, दर एक तासाने शंभर पावले चालणे, शरीराचे सर्व स्नायू दिवसातून तीनचार वेळा ताणणे यासारख्या साध्या सोप्या सवयीमुळे वजन आटोक्यात ठेवता येते. या कृती अवघड नाहीत पण त्यांची सवय लावून घेणे सोपे नाही.
आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिण्याची सवय देखील वजन वाढवते. आपल्या शरीराच्या मेदाच्या पेशींमध्ये पाणी साठवलेले असते म्हणूनच वजन कमी करण्यासाठी दिलेल्या चिकित्सेमध्ये मूत्र वाढवण्याची औषधे दिली जातात. स्वेदन उपचारांनी देखील शरीरातील पाणी कमी होत असल्याने वजन कमी होते. पण हे सर्व उपाय तात्कालिक असतात. दिवसभरात अडीच ते तीन लीटर पाणी शरीराला पुरेसे असते त्यापेक्षा अधिक पाणी पिण्याची सवय बदलली तर वजन कमी होऊ लागते. काही स्थूल माणसांना सतत तहान लागत असते त्यांनी त्यावेळी दोन चार घोट गरम पाणी पिण्याची सवय लावून घेतली तर अनावश्यक पाणी शरीरात जात नाही.भराभर जेवणे देखील वजन वाढवायला कारणीभूत असते. आपण जेवायला सुरुवात केल्यानंतर दहा मिनिटांनी आपल्या मेंदूतील तृप्तीचे केंद्र काम करू लागते. त्या दहा मिनिटात आपण खूप कमी खाणे आवश्यक असते त्यामुळेच एक घास बत्तीस वेळा चावून खाण्याची जुनी म्हण आजच्या काळात हि कृतीत आणायला हवी. सावकाश जेवायला हवे, सावकाश म्हणजे कमी वेगाने आणि पोटात अवकाश म्हणजे थोडी जागा ठेवून हे दोन्ही अर्थ खरे ठरायला हवेत, सावकाश जेवू लागलो कि प्रत्येक घास जाणीवपूर्वक खाऊ लागतो. असे लक्षपूर्वक घास घेऊ लागलो तर जेवण हे देखील ध्यान होते. अन्नाचा आस्वाद घ्यायचा पण अधिक खाण्याची आसक्ती सोडायची हे तत्त्व आयुष्यात उतरवले तर वजन न वाढवता देखील आपण रसपूर्ण जेवू शकतो, सरस जगू शकतो.

समजूतदार पालक होण्यासाठी खास टिप्स


आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला स्वतः शांत आणि संयमी राहणे आवश्यक आहे. अनेकदा आपला कामावरचा किंवा इतर गोष्टींचा राग आपण मुलांवर काढतो. मग चिडचिड होते. या सगळ्यात तुम्हाला शांत पालक होण्यासाठी या टिप्स नक्कीच मदत करतील.
  1. तुमचे मुल अनेक व्यक्तींना भेटत असते. त्यामुळे त्यांच्याकडून ते काही शिकत असते. परिणामी त्यांच्या वागण्यात बदल होऊ लागतात. अशावेळी जेव्हा तुम्हाला मुलांचे वागणे पटणार नाही तेव्हा त्यांच्यावर रागावण्याऐवजी मुलाला समजून घ्या आणि चुकीची जाणीव योग्य शब्दात करून द्या.
  2. कधी कधी मुलं खूप जास्त दंगा मस्ती करतात. अशावेळी राग अनावर होतो. पण न रागवता दीर्घ श्वास घ्या. काही वेळाने मुलं शांत होईल तेव्हा कोमल शब्दात त्याची समजूत घ्याला.
  3. मुलं जेव्हा जास्त हट्ट करते किंवा मस्ती करते. तेव्हा राग नियंत्रित ठेवणे शक्य नसल्यास दुसऱ्या खोलीत निघून जा. राग शांत झाल्यावर परिस्थिती हाताळा.
  4. मुल खूपच मस्ती करत असेल तर एखादी सौम्य शिक्षा तुम्ही त्याला देऊ शकता. पण त्यानंतर त्याला कोमल शब्दात चुकीची जाणीव करुन द्या.
  5. जर तुमचे मुल चिडले, रागावले असेल तर तुम्ही त्याच्यावर चिडू, रागावू नका. याऐवजी मुलाचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा. यामुळे नक्कीच फायदा होईल.

Wednesday, January 23, 2019

स्पर्म काउंटसाठी पुरुषांनी कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत


सोसायटी फॉर रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिनच्या रिसर्चनुसार पुरुषांच्या आहाराचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इफेक्ट स्पर्म काउंटवर पडतो. यामुळे पुरुषांनी आहारात अशा पदार्थाचा समावेश करावा, ज्यामुळे स्पर्म काउंट वाढेल. यासोबतच काही गोष्टींपासून दूर राहावे, ज्यामुळे स्पर्म काउंट कमी होतो. 

 स्पर्म काउंट कमी होण्याची  करणे 
- हार्मोन लेव्हल संतुलित नसल्यामुळे.
- जास्त वजन वाढल्याने.
- स्मोकिंग जास्त केल्याने.
- जास्त स्ट्रेसमुळे.
- जेनेटिक कारणांमुळे.

कोणते पदार्थ खाल्ल्याने वाढतो स्पर्म काउंट...
डाळिंब
यामध्ये अँटीऑक्सीडेंट्स असतात. हे बॉडीमध्ये टेस्टेस्टेरॉन हार्मोनची लेव्हल वाढवतात. यामुळे पुरुषांमधील स्पर्म काउंट, सीमेन व्हॉल्युम वाढतो.

लसूण
यामध्ये असलेले सेलेनियम स्पर्मची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही वाढवते.

पालक
यामध्ये आयरन असते. यामुळे सर्व बॉडी पार्ट्समध्ये ऑक्सिजन पोहोचतो. याचा फर्टिलिटीवर पॉझिटिव्ह इफेक्ट पडतो.
आक्रोड
यामध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स मेल ऑर्गन्समध्ये ब्लड फ्लो वाढवतात.

फिश
यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स, प्रोटीन असते. यामुळे फर्टिलिटी वाढते.

कोणते पदार्थ खाल्ल्याने कमी होतो  स्पर्म काउंट.. 
सोयाबीन
यामध्ये आयसोफ्लेवोन्स, फायटोएस्ट्रोजन्स असतात. यामुळे स्पर्मची संख्या कमी होते.

पुदिना
यामध्ये मेंथॉल असते. याचा जास्त युज केल्यास सेक्शुअल हार्मोनवर निगेटिव्ह प्रभाव पडतो.

साखर
यामुळे ब्लड शुगर लेव्हल कमी होते आणि फर्टिलिटीवर याचा निगेटिव्ह प्रभाव पडतो.

पिझ्झा बर्गर
यामध्ये ट्रान्स फॅटी अॅसिड्स असतात. यामुळे स्पर्म काउंट कमी होतो.
यामध्ये आर्टिफिशिअल स्वीटनर्स असतात. यामुळे इन्फर्टिलिटीची समस्या वाढते.

गांजा पासून शरीरावर होणारे दुष्परिणाम


अमली पदार्थाची व्यसनाधीनता हा जगापुढे असलेला आरोग्याचा एक अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न आहे. अमली पदार्थाच्या सेवनाने निर्माण होणारे आजार, व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबाला सोसावा लागणारा आर्थिक आणि मानसिक बोजा, अमली पदार्थ मिळवण्यासाठी पत्करले जाणारे धोके आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम, असे या सामाजिक प्रश्नाचे विविध पैलू आहेत. मुळात अमली पदार्थ येतात कुठून, त्याचा पुरवठा कोण करतं, यामागचे राजकारण आणि अर्थकारण काय, यावर उपाय काय, अशा सर्व बाजूंनी हा सामाजिक आरोग्याचा प्रश्न विचारात घ्यावा लागतो. आज आपण गांजा पासून आरोग्यावर होणारे परिणाम जाणून घेणार आहोत.
गांजाचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो खास करून  मेंदू, चेतातंतू, पचनसंस्था, मूत्रजननसंस्था,  जननसंस्था, रक्त, श्वसनसंस्था वगैरे
१.  गांजाची मात्रा वाढल्यास प्रचंड झोप येणे, अगदी बेशुध्दीपर्यंत अवस्था येऊ शकते. निरनिराळे भास होणे, खूप आनंद वाटणे वगैरे परिणामांमुळे गांजा जास्त घेण्याकडे आणि नियमितपणे घेण्याकडे कल होतो. यामुळेच व्यसन वाढते
२.  गांजाचे व्यसन खूप दिवस असल्यास भूक मंदावणे, अशक्तपणा, थरथर, गोंधळल्यासारखे वाटणे, लैंगिक इच्छा कमी होणे असे दुष्परिणाम होतात. स्पर्म कांऊट कमी  होतो त्यामुळे वंध्यत्व येऊ शकते.
३. गांजामुळे बाधा झालेल्या रुग्णास श्वसनाचे आजार होतात.व अचानक श्वसन थांबून मृत्यू येण्याचा संभव असतो.
४.गांजाच्या वापराने रक्तदाब वाढतो आणि रक्तदाब वाढल्याने हृदयविकार होउ शकतो.
५. गांजाचे व्यसन खूप दिवस असल्यास फुफुसाचा कर्करोग, रक्ताचा कर्क रोग, मेंदूचा कर्क रोग होऊ शकतो. 

आदर्श पालकत्व व मुलांच्या भावनिक गरजा.


आपण पालक आहोत या विलक्षण आनंदात माझी सकाळ सुरु होते. माझ्या दोन छोट्या छोट्या मुलींशी मला चांगलं वागत येत हा उदंड आत्मविश्वास  मला सुखावून जातो.
             एक पालक म्हणून माझ्या मुलींसोबतचे माझे वागणे सकारात्मक आणि फलदायी असते. बालकांचा भावनिक विकास घडवून आणण्यासाठी काय गरजेचे आहे. हे मी ओळखतो . दिवस भरात काहीही घडले-बिघडले तरी माझे वर्तन सकारात्मक आणि सातत्यपूर्ण असेल याची मी काळजी घेतो. भावनेच्या भरात जाऊन हताश होत नाही, निराश होत नाही व चिडचिड करत नाही.
            पालकत्वाची जबाबदारी निभावणं हि माणसाच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची, गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक बाब आहे. एकदा का तुम्ही पालक झालात कि कायमचे पालक राहता. आणि कालांतराने ते सोपे वाटत  नाही बरं का. दिवसेंदिवस पालक म्हणून आपल्या समोर उभे राहणारे प्रश्न कमी न होता  वाढतच जातात. असे म्हणतात ना " जेव्हा मुले लहान असतात तेव्हा त्यांचे प्रश्न पण किरकोळ असतात पण मुलं जशी मोठी होतात त्यांचे प्रश्न हि मोठे मोठे होत जातात " आपल्या मुलांबद्दल पालकांना वाटणारी काळजी कधी कमी होत नाही.
           खरं तर चिंता, बदल आणि अनिश्चितता यांनी ग्रस्त झालेल्या काळात आपली मुलं वाढताहेत त्यामुळे आधीच्या काळात वाढलेल्या मुलांच्यापेक्षा या मुलांच्या वाट्याला येणारे अनुभव निश्चितच वेगळे आहेत . अनिश्चिततेमुळे शालेय वयात आत्महत्या , हिंसाचार , व्यसनाधीनता यांचे प्रमाण वाढत आहे.
            मुलांना नेमकं काय द्यायचं याबद्दल आपल्या मनात शंका व भीती दोन्ही आहे. त्यामुळे मुलांना सुरक्षित ठेवण्याचे, शिस्त लावण्याचे अतोनात प्रयत्न करतो. त्यासाठी आपण त्यांना बोलतो, फाटकारतो. त्यांची कठोर शब्दात हजेरी घेतो.आणि दुसऱ्या क्षणाला त्यांना लाडानं कुरवाळतो.
           खरं सांगायचं झालं तर पालक म्हणून आपण बहुतेक वेळा प्रतिक्रियाच देता राहतो. त्यासुद्धा मुलांनी केलेल्या चुका दुरुस्त करण्याच्या हेतूने. पण मुलांनी त्या चुकाच करू नयेत यासाठी कल्पकतेने त्यांना उतेजन देणारं सकारात्मक वातावरण आपण तयार नाही. आदर्श पालकत्व कसं असावं याची आपल्याला दूरदृष्टीच नसते  मग  ते साध्य करण्याचे मार्ग तरी कसे मिळणार. पालकत्वबद्दलचा माझा मूलभूत सिद्धांत सांगायचं झाला तर मुलांचे भावनिक आरोग्य सांभाळा त्यासाठी त्यांच्या 5  भावनिक गरजा पुरवा (आदर , महत्व , स्वीकार , सामीलकी  आणि सुरक्षितता )प्रत्येक मुलाला वाटते आपला आदर व्हावा .आपला मान राखला जावा. समाजात आपल्याला महत्व मिळावं कोणी आपल्याबरोबर दूरभाव करू नये. आणि आपण सुरक्षित आहोत असे त्यांना वाटणे गरजेचे आहे.
    आदर्श पालक बनण्यासाठी आपण हे करू शकतो.
1. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावा.
2. घरात मुलांसमोर  आदळ-आपट, भांडणे करू नका.
3. रोज एक चांगले काम करण्याची सवय लावा त्याबद्दल दररोज घरात मुलांसमक्ष चर्चा करा.
4. मुलांना अपमानास्पद बोलू नका, मूल तुम्हाला टाळणे चालू करेल.
5. मुलाने  चूक केल्यास त्याला चांगल्या पद्धतीने समजाऊन सांगा व  माफ करा, त्याने चांगले काम केले असेल तर  त्याचे तोंड भरून कौतुक करा.
6.मुलांसाठी आई-बाबांकडे वेळ असावा.
7. आई साठी व आजी-आजोबांसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या-छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे.
 8. मूले ही आपल्या भविष्याची सोय नाहीत, म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका.
9. मुलांदेखत कुठलंहि व्यसन करू नका.
10. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या, मूल कितीही लहान असेल तरी !
11. आपण मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा.
12. आपल्या मुलांच्या गरजा समजून घ्या.
13. मुलांच्या प्रश्नांना समर्पक व वैज्ञानिक दृष्टीने उत्तरे द्या. त्यांची प्रश्ने टाळू नका.
14. श्रध्दा व अंध-श्रध्दा यांतील फरक मुलांना समजावून सांगा.
15. मुलांना लहानपणीच मोबाईल खेळणे म्हणून देऊ नये.
टी व्ही, लॅपटाॅप ई. ची सवय लावू नये.
16. मुलांना घराबाहेर मैदानी खेळ खेळण्याची सवय लावावी. पराभव सहन करता आला पाहीजे !
17. मुलांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण करावी.
18. मुलाची प्रत्येक मागणी सर्रासपणे पूर्ण करू नये. त्यांना नकाराची सवय लावावी.
19. ईतरांचा मान-सन्मान करणे, अदबीने बोलणे शिकवावे, भाषा चांगली असावी !
20. ऑफिस मध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना पालक म्हणून घरी या.
21. मुलांशी कधीही नाकारात्मक-दृष्ट्या बोलू नये.
22. मुलास नालायक, गाढव, मूर्ख ई. अपमानकारक शब्द वापरू नये.
23. मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो (विशेषत: आई),
परंतु मुलांना काही प्रमाणात रिस्क घेऊ द्यावी.
24. मुलांना मारणे अत्यंत चुकीचे आहे, त्यामुळे मूले खोटे बोलायला लागतात....... प्रेमापोटी देखील मारू नये.
25. तू जर हे केलस तर मी सोडून जाईन, तुला एकटे सोडून देईल असे मुलांशी कधीही बोलू नये.
26. मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या वर्तनाचे कौतुक करावे.
27. यशस्वी लोकांबाबत घरात नेहमी चर्चा करावी.
28. मुलांच्या प्रगती-पुस्तकाकडे  पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा.
29. समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांबाबत मुलांशी चर्चा करा, हत्या, आत्महत्या, हिंसा, ई.  कशा वाईट आहेत हे समजावून सांगा.
30. मुलांचे मित्र, मैत्रीणी कोण आहेत, त्यांचेशी पण संवाद असू द्या.
31. मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष पूरवा, आवश्यकते नुसार तज्ञांचा सल्ला घ्या.
32. आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरू व्हा ! 

मोबाईल व लॅपटॉप वापरताना कोणती काळजी घ्यावी वाचा डॉ. भरत चौगुले यांच्या टिप्स


आजकाल मोबाईल फोन व लॅपटॉप चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि हा वापर अनिवार्य  झाला आहे. त्यामुळे वापरणे टाळणे शक्य नसल्याने वापरताना थोडी काळजी घेणे गरजेचे आहे.
१ चार्जिंग सुरु असताना मोबाईल वर बोलणे किंवा लॅपटॉप वर काम करणे टाळा. चार्जिंग सुरु असताना रेडिएशन चे प्रमाण दुपटीने वाढते त्यामुळे शॉक लागणे किंवा स्फोट होणे अशा घटना घडतात.
२. शरीरापासून मोबाईल व लॅपटॉप कमीतकमी एक  दीड फूट लांब ठेवावा,
      मोबाईल व लॅपटॉप मधून निघणारे रेडिएशन हे शरीरासाठी घटक आहेत. त्यामुळे त्याचा थेट संपर्क शरीराला होऊ देऊ नये. मोबाईल वरच्या खिशात ठेऊ नये त्यामुळे हृदय विकाराचे प्रमाण वाढते. व पुरुषांनी लॅपटॉप मांडीवर ठेऊन काम करू नये त्यामुळे शुक्राणूचा काउन्ट कमी होतो. त्यामुळे  गर्भ धारणेस अडथळे येतात.
३. झोपताना उशीखाली मोबाईल ठेऊ नका हानिकारक रेडिएशन चा मेंदूवर परिणाम होऊन भविष्यात तुम्हाला मेंदूचा कॅन्सर होऊ शकतो.
४. रात्री अंथरुणात पांघरून घेऊन मोबाईल हाताळणे बंद करा.
        अंधारात मोबाईल मधून निघणारा कडक प्रकाश जास्त वेळ डोळ्यावर पडल्यास डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे  मोबाईल लॅपटॉप चा उपयोग पुरेशा उजेडात करा.
५. गरोदर असताना.
     गरोदर असताना जास्त वेळ मोबाईल वर बोलणे टाळा. लॅपटॉप वापरात असाल तर शरीरापासून विशेषतः पोटापासून लांब ठेवा

असे करा मुलांवर लहान वयातच संस्कार

असे करा मुलांवर लहान वयातच संस्कार.
  
लहान मूल म्हणजे मातिचा गोळा असतो, त्याला तसा आकार द्यावा तसे ते घडते,अशी आपल्याकडे म्हण आहे. यामुळेच तुम्ही मुलांना लहान वयातच चांगल्या सवयी लावायला हव्यात. जाणून घ्या, कशा ते...
स्वावलंबी बनवणे - लहानपणीच मुलांना योग्य वळण लावावे. झोपून उठल्यावर स्वतःच्या पांघरुणाची घडी घालायला शिकवावे. सुरुवातीला नीट येणार नाही; पण हळूहळू मूल जसे मोठे होईल, तसा व्यवस्थितपणा त्याच्या अंगी आल्याशिवाय रहाणार नाही. शाळेचा अभ्यास, शाळेची तयारी त्यांची त्यांनाच करायला शिकवावी. अभ्यासाची पुस्तके, वह्या निटनेटक्या व जागच्याजागी ठेवायचे वळण लावावे. शाळेतून अथवा बाहेरून आल्यावर चप्पल-बूट, दप्तर वगैरे ठराविक जागीच ठेवायला शिकवावे.
प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्यास शिकवणे - मोठ्यांच्या कृतींतूनच लहान मुले शिकतात, म्हणून मोठ्यांनीच आपले वागणे, बोलणे, इतरांना मान देणे, हे सर्व केले पाहिजे. तसेच प्रत्येक गोष्ट वेळेवर करावी. ‘मग करू’ म्हटले की, पुन्हा ती गोष्ट केली जात नाही. त्यासाठी शरीराला म्हणण्यापेक्षा मनालाच शिस्त लावायला पाहिजे.
अती लाड न करणे - आजकाल घरांतून एखाद-दुसरेच मूल असल्याने त्यांची आवड-नावड जपली जाते. जेवण, कपडे सर्वच बाबतींत ‘मुले म्हणतील ती पूर्व दिशा’, असे आढळून येते. लहानपणापासून त्यांचे ऐकत गेले की, मुले पुढे ऐकेनाशी होतात. त्यामुळे त्यांचे अती लाड करू नयेत.
कृतज्ञता - एखाद्या व्यक्तीने मदत केल्यास तिची कृतज्ञचा व्यक्त करायला शिकवावे.
लवकर झोपून लवकर उठणे - लहानपणापासूनच मुलांना लवकर उठण्याची सवय लावावी. पुष्कळ घरांतून बघायला मिळते की, मुले अभ्यासासाठी रात्री जागतात व सकाळी ९ वाजता उठतात. याउलट रात्री लवकर झोपून पहाटे अभ्यास केला असता तो जास्त चांगला लक्षात रहातो. लवकर निजे व लवकर उठे, त्यास आरोग्य व धन-संपत्ती मिळे।’, असा श्लोक आहे. तसेच हे निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
मुलांना  तुम्हाला चांगली व्यक्ती बनायचे असल्याने स्वतःवर चांगले संस्कार करून घेण्याचा प्रयत्न करा. चांगले संस्कार आणि वाईट संस्कार यांची काही उदाहरणे पुढे देत आहोत.
२ अ. चांगले संस्कार : सकाळी लवकर उठणे, आई-वडील अन् मोठी माणसे यांना नमस्कार करणे, सर्वांशी नम्रतेने अन् प्रेमाने वागणे, स्वच्छता राखणे, नीटनेटके रहाणे, प्रतिदिन शाळेत जाणे, गृहपाठ वेळच्या वेळी करणे, आईला घरकामात साहाय्य करणे इत्यादी.
२ आ. वाईट संस्कार : सकाळी उशिरा उठणे, सतत दूरचित्रवाणी (टी.व्ही.) पहात बसणे, अभ्यास न करणे, उलट बोलणे, अस्वच्छ रहाणे, पुस्तकांचा खण व्यवस्थित न ठेवणे, खोटे बोलणे इत्यादी.
संस्कार करणे म्हणजे चांगल्या सवयी लावणे व वाईट सवयी काढून टाकणे. मुलांवर चांगले संस्कार करावयाचे म्हणजे त्याला 'आई-वडिलांना रोज नमस्कार कर', 'दुसऱ्याची निंदा करू नको' इत्यादी शिकवावयाचे; पण ते कसे शिकवावयाचे – तर तत्त्वज्ञान सांगून नाही, गोष्टी सांगून नाही, चॉकलेट, आईस्क्रिमची लाच देऊन नाही, तर आपल्या कृतीने. आठ वर्षांच्या मुलांना रोज मोठ्या मंडळींना नमस्कार करावयाची आज्ञा दिलीत, तर ४ दिवस करील. पाचव्या दिवशी सांगेल ''मी नाही करणार.'' त्याला नमस्कार करण्याच्या फायद्यांबद्दल तत्त्वज्ञान सांगितले, तरी उपयोग होणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की, तुमच्या मुलाने मोठ्या मंडळींना नमस्कार करावा, तर एकच उपाय आहे. आजपासून तुम्ही घरातील सर्व वडील मंडळींना रोज फक्त एकदाच नमस्कार करा. मुलाला एकदापण नमस्कार करावयास सांगू नका. चार दिवसांच्या आत मुलगा तुमच्या पाठीमागे येऊन घरातील मोठ्या माणसांना नमस्कार करू लागेल. त्याला लाज वाटेल, की माझे आई-बाबा रोज आजी-आजोबांना नमस्कार करतात. मी मात्र बेशरमासारखा उभा आहे. संस्कार करणे म्हणजे तोंड बंद कृती चालू !
३. लहान वयातच चांगले संस्कार करण्याची आवश्यकता
३ अ. चांगले संस्कार झाल्याने जीवन आदर्श बनते :पूर्वीच्या काळी सर्वच मुले मोठ्यांचा आदर राखत, त्यांना प्रतिदिन (दररोज) वंदन करत. जेवण्यापूर्वी श्‍लोक म्हणत. सायंकाळ होताच हात-पाय धुऊन देवासमोर दिवा लागल्यावर स्तोत्रे म्हणत. रात्री लवकर झोपत आणि सकाळी लवकर उठत. अशा वागण्यामुळे त्यांच्यात चांगले गुण निर्माण होत असत. मुलांनो, तुम्हाला आदर्श विद्यार्थी म्हणून सर्वांनी ओळखावे, असे वाटत नाही का ? आदर्श विद्यार्थी बनण्यासाठी तुम्ही गुणी व्हायला हवे. चांगले संस्कार झाल्यावर तुम्ही गुणी आणि म्हणून आदर्श व्हाल.
३ आ. चांगले संस्कार झाल्याने जीवन आनंदी बनते :आई-वडिलांचे ऐकणे, मोठ्यांचा आदर करणे, देवाची भक्ती करणे इत्यादी संस्कारांमुळे देवाचा आशीर्वाद मिळून जीवन आनंदी बनते. याउलट दुसर्‍यांची टिंगलटवाळी करणे, मोठ्यांशी उद्धटपणे बोलणे, खोटे बोलणे इत्यादी कुसंस्कारांमुळे पाप लागत असल्याने जीवन दुःखी बनते.
३ इ. आदर्श पिढीमुळे राष्ट्राचा उद्धार होतो : छत्रपती शिवाजी महाराज आदर्श असे हिंदवी स्वराज्य स्थापू शकले; कारण ते स्वतः आदर्श होते. आपणही आदर्श बनलो, तर राष्ट्राचाही उत्कर्ष होईल.